| नेरळ | प्रतिनिधी |
पावसाळा सुरु होताच नेरळमधील बाजारपेठ गोड्या पाण्यातील वळगणीच्या माशांनी भरते. येथील अंबिका नाक्यावर संध्याकाळी भरणाऱ्या मासळी बाजारात गोड्या पाण्यातील मासे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.
पावसाळ्यात पकडले जाणारे मासे हे चवदार असतात. त्यामुळे त्यांची खरेदी करण्यासाठी कल्याणपासून पनवेलपर्यंतचे ग्राहक येत असतात. तसेच, पावसाळा सुरू झाली की माशांच्या पोटामध्ये असलेली अंडी व भरलेले मासे खाण्याकडे खवय्यांच्या अधिक कल असतो. हे मासे काही ठराविक काळ सापडत असल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी कातकरी समाजाचे लोक दिवसरात्र एक करीत असतात. त्यामुळे हे वळगणीचे मासे पकडून आणण्यासाठी आणि त्यानंतर विक्रीसाठी आणण्याकरिता धडपड असते. कुंभे येथील कातकरी समाजाच्या लोकांचा हा व्यवसाय वर्षभर सुरू असतो. नेरळमधील अंबिका नाका आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे मासे विक्रेते बसलेले असतात. यात खेकडे (मुठे), काळी चिंबोरी, काळ्या रंगाचे मळ्याचे मासे, चिवना मासे, करावले, मुरी, डाकूमासा, वाम, शिवडे अशा अनेक प्रकारचे मासे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसत आहेत. विक्रीसाठी आणलेले मासे हे उल्हास नदीच्या पाण्यातून तसेच, परिसरातील धरणांमधून पकडून आणले जातात. हे मासे गोड्या पाण्यातील असल्याने ते मासे खरेदीसाठी कल्याणपासून पनवेलपर्यंतच्या खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
आमच्या हॉटेलच्या बाजूला तब्बल 52 वर्षांपासून मासे विक्री करण्यासाठी आदिवासी लोक येत असतात. आम्ही त्या सर्वांना तेथे बसण्यासाठी कधीही आडकाठी करीत नाही आणि तशी शिकवण आमच्या वडिलांची आहे. त्यामुळे त्या आदिवासी लोकांबरोबर माझे घराच्यासारखे संबंध निर्माण झाले आहेत.
प्रकाश नायक, अंबिका हॉटेलचे मालक
यावर्षी पाऊस लांबल्याने गोड्या पाण्यातील मासे खायला मिळाले नव्हते. मात्र, यावेळी लवकर पाऊस सुरू झाला असून नाक्यावर मासे विकायला येऊ लागले आहेत. पाऊस लांबल्याने वलगणीचे मासे मिळायला थोडा उशीर झाला पण, हे मासे खाल्लेच पाहिजेत आणि त्यामुळे भरपूर मासे खरेदी करत आहोत.
दिलीप कराळे, ग्राहक