स्थानिकांनी पोलिसांचे दुर्लक्ष
| अलिबाग | प्रतिनिधी |
रेवदंड्यामध्ये माऊली कॉटेजमध्ये छापा टाकून गांजा विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईने गांजा विक्रेत्यांना दणका मिळाला आहे. मात्र, या परिसरात आणखी तिघेजण गांजा विक्री करीत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून उपलब्ध झाली असून, रेवदंडा पोलिसांना याची खबर असल्याचे सांगण्यात आले आहे.
रेवदंडामधील थेरोंडा फाटा येथे स्वामी माऊली कॉटेज आणि घरावर छापा टाकून रायगड पोलिसांनी गांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. आशिष तळेकर आणि अर्चना तळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सुमारे सात किलोचा गांजा जप्त केला. मात्र, रेवदंडा परिसरात आणखी तिघेजण हा धंदा चालवित असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या काही परराज्यातील मंडळींना दारुपेक्षा गांजाची झिंक गरजेची असते. त्यात काही पर्यटकदेखील गांजाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे काही मंडळी कॉटेजच्या नावाखाली दोनशे ते तीनशे रुपयांनी गांजा विकतात. त्यामुळे रेवदंडा परिसरात गांजा विक्रीला प्रचंड ऊत आल्याचे दिसून आले आहे.
रेवदंडा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असताना ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्याही रेवदंड्याची एक वेगळी ओळख आहे. परंतु, गेल्या वर्षभरापासून रेवदंडा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेत येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी रेवदंड्याच्या बंदरावर डिझेल तस्करी राजरोसपणे सुरु होती. या तस्करीवर सीमा शुल्क विभागाने कारवाई करीत लाखोंचे डिझेल जप्त केला. मागील काही महिन्यांपूर्वी समुद्रकिनारी इग्लूच्या नावाखाली अवैध धंदा चालविला जात असल्याचा प्रकार समोर आला. त्याच ठिकाणी गांजाही विकला जात होता. आता पुन्हा रेवदंडा चर्चेत आला आहे. रेवदंड्यातील थेरोंडा फाटा येथे कॉटेजमध्ये गांजाची तस्करी होत असताना स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याची माहिती मिळते. परंतु, रेवदंडा पोलीस ठाण्यातील बीटवर असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना या अवैध धंद्याची माहिती का मिळत नाही, असा सवाल जनमानसातून उमटत आहे. रेवदंडा पोलिसांच्या या बघ्याच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
रेवदंड्यामध्ये गांजा तस्करीबरोबरच आता डिझेल तस्करीदेखील राजरोसपणे सुरु असल्याचे उघड झाले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसणे, ही मोठी चिंतेची बाब आहे. या अवैध धंद्याबाबत नव्याने दाखल झालेल्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. सध्याचे पोलीस अधिकारी अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी निर्णयक्षम पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.