सेझग्रस्त शेतकऱ्यांनी मानले आ.जयंत पाटील यांचे आभार

। उरण । वार्ताहर ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सेझग्रस्त शेतकऱ्यांची जोरदार बाजू मांडून याप्रश्नी राज्य शासनाचे लक्ष वेधले. याबद्दल सेझग्रस्त शेतकऱ्यांनी रविवारी आ. जयंत पाटील यांची अलिबाग येथील शेतकरी भवनमध्ये भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी आ. जयंत पाटील यांनी याविषयी लवकरच महसूलमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवू, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. यावेळी ॲड. दत्तात्रेय नवाळे, सेझग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, रामदास भोईर, प्रदीप मोकल, आनंद ठाकूर, मुरलीधर म्हात्रे, उरण विभागातून चंद्रकांत घरत, रमेश कदम, लक्ष्मण घरत, रघुनाथ भोईर आदी शेतकरी हजर होते.

सन 2005 मध्ये उरण, पेण व पनवेल तालुक्यातील 45 गावांमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र स्थापण्याकरिता महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 अनुसार व तेव्हाचे विकास आयुक्त (उद्योग) यांचे दि. 16 जुन 2005 चे परवानगी नुसार 30 टक्के जमीन मिळकत मे मुंबई इनटीग्रेट एस.ई.झेड लि. कंपनीला खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, सदर जमीन मिळकत खरेदी करण्यास कंपनी असफल झाली. तसेच सदरची कंपनी 15 वर्षांमध्ये प्रकल्प उभा करण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे कंपनीने खरेदी केलेल्या जमीन मिळकती परत करण्याकरिता उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे चौकशी अर्ज दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन फेब्रुवारी 2023 मधे प्रकरण अंतिम आदेशाकरिता ठेवण्यात आले. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे पाठविले असून, आजतागायत पाच महिने होऊनसुद्धा त्यावर कोणताही निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला नाही.

Exit mobile version