। अलिबाग । प्रतिनिधी ।
रिक्षामध्ये अनवधानाने तब्बल 16 हजार आठशे रुपयाची रोख रक्कम विसरून गेलेल्या महिला प्रवाशाचे पैसे परत करत विलास वासुदेव राऊत या रिक्षाचालकाने अजूनही समाजात प्रामाणिकपणा टिकून आहे हे आपल्या कृतीतून दर्शविले. त्यांच्या आदराबद्दल महिला प्रवासी आर. एस. चांदोरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
आरडीसी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत व्यवस्थापक असलेल्या चांदोरकर अलिबाग टपाल कार्यालयाजवळ रिक्षात बसल्या.अलिबाग एसटी आगार येथे त्यांना सोडून विलास राऊत टपाल कार्यालयाजवळ आले असता त्यांना रिक्षाच्या पाठच्या सीटवर पैशांचे पाकीट सापडले. त्यातील रक्कम पाहून हे पाकीट त्याच महिला प्रवाशाचे आहे ही बाब राऊत यांच्या लक्षात आली. बराच वेळ ते टपाल कार्यालयाजवळ महिला प्रवाशाची वाट पाहत होते. पेण येथे पोहचल्यावर आपण रिक्षात पैसे विसरल्याचे चांदोरकर यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपले सहकारी अप्पा काळेल यांना भ्रमणध्वनीवरून घडलेली घटना कळविली.
यानुसार अप्पा काळेल आणि संदीप बाष्टे यांनी रिक्षावाले विलास राऊत यांना संपर्क केला. पैसे आपल्याच जवळ असल्याची खात्री देत राऊत यांनी आर. एस. चांदोरकर याना रक्कम सुपूर्द केली.