खारीतील तलाव परिसरात शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती
| चौल | प्रतिनिधी |
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याफ, मंगलमूर्ती मोरयाफ असा जयघोष करत पाच दिवसांच्या बाप्पाला शनिवारी 23 सप्टेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावातील गणेशभक्तांनी वाजत-गाजत निरोप दिला. त्याचबरोबर तीन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या गौरीचेही मोठ्या थाटामाटात खारीतील तलावात विसर्जन करण्यात आले.
दिवसभर अधूनमधून बरसणारा पाऊस, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अशा भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. विसर्जन स्थळी चौलमळा युवक मंडळाकडून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करताना कोणतीही अडचण आली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना गुलालाची उधळण करत, नाचत-गात बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी गावप्रमुख रवींद्र घरत, जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, अल्पेश घरत, योगेश जाधव, रवींद्र नाईक, प्रशांत आमरे, महेश पाटील, सचिन गोंधळी, दिलीप म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, युवक मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली. बुद्धीची देवता सर्वांना सुख, समृद्धी, शांती प्रदान करो, सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडो, अशी प्रार्थना गावाच्या वतीने रवींद्र घरत यांनी गणरायाकडे केली.