| नागपूर | प्रतिनिधी |
दोन दिवस पडणाऱ्या पावसाने नागपुरात हाहाकार उडवला आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू तर 10 हजारांहून अधिक घरेे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. दागा लेआऊटमध्ये देखील फडणवीसांनी नुकसानाचा आढावा घेतला. पूरग्रस्त इमारतींमध्ये पाहणी करताना काही रहिवाशांनी प्रशासनाबाबत नाराजी देखील व्यक्त केली. नाग नदी परिसरात ढगफूटीसदृश पाऊस झाल्याने नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाल्याने शहरात पाणी शिरले.
पूरस्थितीमागच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक कारण समोर आले आहे, आणि ते म्हणजे शासकीय यंत्रणांच्या विविध विकासकामांमुळे नाद नदीच्या प्रवाहाला जागोजागी अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नदीने आपला प्रवाह बदलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीताबर्डी, धांतोली मार्केटमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले.
फडणवीस म्हणाले, नागरिकांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. नागपुरात झालेला पाऊस हा नेहमीपेक्षा अधिक पट जास्त होता. प्रत्येक आपत्ती काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे आता तशी व्यवस्था केली जाईल. नागपूर शहरात 10 हजार घराचे नुकसान झाले आहे. त्यांना योग्य ती मदत केली जाईल.