कोकण कन्येचा नाद खुळा!, लाल मातीत केली काळीमिरीची लागवड

| राजापूर। प्रतिनिधी |
उच्चशिक्षीत असूनही मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी करण्याऐवजी तालुक्यातील कुवेशी येथील कामिका गिरीधर नार्वेकर या तरूणीने शेतीची कास धरली आहे. शेतकर्यांकडून काहीसे दुर्लक्षित केल्या जात असलेल्या ‘बुशमिरी’ची (काळीमिरी) त्यांनी सुमारे सव्वा गुंठे क्षेत्रामध्ये व्यवसायिकदृष्ट्या लागवड केली आहे. उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत म्हणून शेतीची ओळख असली तरी, युवावर्गाकडून शेतीला काहीसे दुर्लक्षित केले जात असताना कामिका यांनी व्यवसायिकदृष्ट्या शेतीची धरलेली कास निश्‍चितच युवावर्गासाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल. कामिका त्यांची आई सीमा नार्वेकर यांचे मार्गदर्शन आणि योगदान मिळाले आहे.
मुंबईमध्ये बालपण आणि पुढे मुंबईतील कॉलेजसह कोकण कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतले असले तरी शेतीची आवड आहे. त्यांनी सुमारे सव्वा गुंठे जागेमध्ये शेतकर्यांकडून काहीसे दुर्लक्षित केल्या जात असलेल्या बुशमिरीची लागवड केली आहे.
आचरा येथील राजन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाशेहून अधिक रोपांची त्यांनी लागवड केली आहे. विशिष्ट आकाराच्या तयार केलेल्या सिमेंटच्या कुंड्या एकावर एक रचून त्याच्यामध्ये कौशल्याने रोपांची लागवड केली आहे. वाढत्या तापमानाचा रोपांवर प्रतिकूल परिणाम होवू नये म्हणून शेडनेटही उभारली आहे. सद्यस्थितीमध्ये रोपांवर काळीमिरीची चांगलीच फळधारणा झाली आहे.
येत्या काही कालावधीमध्ये ती परीपक्व होवून त्याची तोड केली जाणार आहे. मसाल्याच्या उत्पादनासाठी काळीमिरीला बाजारपेठेमध्ये मोठ्याप्रमाणात मागणी असल्याने चांगला दर मिळण्याचा आशावाद कामिका यांनी व्यक्त केला. भविष्यामध्ये मिरची पावडर बनवून विक्री करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी बुशमिरीच्या रोपे तयार करून त्यांची विक्री करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतामध्ये पिकविलेली भाजी आणि कडधान्याची गावासह परिसरामध्ये विक्री केली असून त्याच्यातून चांगले उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शेतामध्ये स्वतः राबणार्‍या कामिका यांना व्यवसायिकदृष्ट्या शेती करण्यामध्ये वडील गिरीधर आणि सिमा यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिकूल हवामानासह विविध कारणांमुळे न परवडणारी शेती आणि नोकरीच्या निमित्ताने कोकणातील युवक-युवतींकडून अर्थाजनासह नोकरीसाठी मुंबईची वाट धरली जात असताना कामिका यांनी गावामध्ये राहून शेतीची धरलेली कास निश्‍चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.
जादा उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा भडीमार करण्याऐवजी कामिका यांनी सेंद्रीय खताला प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये गोकृपा औषधाचा प्राधान्याने उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले. भाताची करलं, गाईचे दुध, ताक, गांडुळ खत, नारळाचा सोडणं आदींचा उपयोग करीत स्वतः घरीच गोकृपा औषध तयार केल्याचे कामिका सांगतात.

Exit mobile version