| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात मान्सूनचा अर्थात मोसमी पावसाचा प्रवास यावर्षी वेगाने सुरू झाला. वेळेआधीच म्हणजे 25 मे रोजी तो दक्षिण कोकणात, तर 26 मे रोजी मुंबईत दाखल झाला. मात्र, 27 मेपासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. पश्चिम रशियावर तयार होणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम यावेळी पहिल्यांदाच भारताच्या मोसमी पावसावर होईल, असे मत इंग्लंड येथे कार्यरत हवामान तज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केले.
त्यांच्या अंदाजानुसार, 27 मेपासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढही होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान पाच जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे पाच जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मोसमी पावसाची शक्यता दिसत नाही. यादरम्यान देशातील इतर भागातसुद्धा मोसमी पावसाचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. यावर्षी राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस पडला. त्यामुळे मोसमी पाऊस लवकरच दाखल होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.