थरकाप उडविणाऱ्या 25 अन् 26 जुलैच्या आठवणी
| पोलादपूर | शैलेश पालकर |
25 व 26 जुलै 2005 रोजी पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजविला. काय झाले असेल? कानावर येणाऱ्या बातम्या अफवा तर नसतील ना? खरंच तसे घडलं असेल तर? प्रत्येकाच्या मनातील मानवतावादी विचार अंत:करण चर्रऽऽ करीत होता. तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्र तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् भाताची रोपेही सोबत वाहून नेत होती. वीस वर्षांपूर्वीच्या 2005 च्या 25 अन् 26 जुलै या दोन दिवसांची आठवण ताजी होतेय. काय-काय घडले होते त्या दिवशी? महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगांव, रोहन गावांत धरणीमातेच्या उदरात अनेक मानवी देह गाडले गेले, तोच प्रकार पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक आणि लोहारे पवारवाडीमध्येही झाला. आपत्ती निवारणाच्या साधनांची कमतरता वाटेल इतपत महाडचा प्रसंग भीषण होता. त्यामुळेच पोलादपूर तालुक्यातील मनुष्यहानीच्या प्रसंगात गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच कशेडी घाटातील दरड हटविण्यासाठी कोणतीही तातडीची उपाययोजना होऊ न शकल्याने पोलादपूरचे जनजीवन तब्बल 11 दिवस ठप्प राहिले.
पोलादपूरचे वाचनालय इमारतीसह वाहून गेले. गंगामाता सभागृह वाहून गेले. सुंदरराव मोरे महाविद्यालय वाहून गेले. जुना महाबळेश्वर रस्ता खचला. सरकारी गोदामातील शेकडो टन धान्य भिजले. पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये पुराने छातीत धडधड वाढवली. गेल्या 100 वर्षांत असा पूर कधी कोणी पाहिला नव्हता.त्यावेळी 82 वर्षांचे असलेले राम गुरूजी यांना घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी सांगितले. वीजमंडळाच्या गोदामाची इमारत आणि शेजारची टपरीवजा हॉटेलची शेडही वाहून गेली. चित्रेंच्या घाटावरील तीन छोटी मंदिरेही फूटून वाहून गेली.
पोलादपूर तालुक्यात आजमितीस 41 जेसीबी आहेत, पण त्याकाळी एक जेसीबी उपलब्ध न झाल्याने कोतवाल बुद्रुकमध्ये कृष्णा सकपाळ, गोपीबाई सकपाळ, काशीनाथ सकपाळ, कांता सकपाळ, राकेश सकपाळ, गीता सकपाळ आणि निखिल सकपाळ सारं कुटुंबच गाडलं गेलं आणि ते जेसीबीअभावी प्रेतं सडल्याने काढताही आली नव्हती. पैठणचा पूल वाहून गेला. कोतवाल खुर्दमध्येही तीनजण गाडली गेली. शेतजमिनी वाहून गेल्या. घरांना तडे गेले. दरडींनी घरं व्यापली. मोठमोठे दगड चेंडूसारखे टप्पे घेत काही घरांच्या कौलांतून पोटमाळयांवर येऊन थांबले. चरईच्या पुलाजवळ उत्तरवाहिनी सावित्रीचे पात्र दिशा बदलून परतले. बंडू चित्रेची चाळ वाहून गेली. बोरावळे येथे डोंगराला भेगा पडल्या. अनेक घरं दुभंगली. तुटवलीत डोंगर खचला अन् पुलही वाहून गेला. लोहारे पवारवाडीत जमीन दुभंगली अन् घर दुभंगून दोघे गाडले गेले. दोघे बचावले. दिविलचा के.टी. बंधारा फुटला. कशेडी घाटामध्ये डोंगर आमराईसह मुंबई-गोवा महामार्गावर उतरला अन् घाट बंद झाला. प्रत्येक गावाची बातमी कधी हुश्श अन् नेहमीच अरेरेऽ! करायला लावणारी होती. वीजपुरवठा तीन दिवस ठप्प, कारण अनेक विजेचे खांब वाहून गेले अन् काही तुटून कोसळले. कोंढवी भागामध्येही जमिनीला तडे गेले. घरामध्ये दरडी शिरल्या. कोतवाल खुर्दच्या एका घराच्या पोटमाळयावर आजही एक मोठी दरड स्थिरावलेली दिसून येत आहे.
अनेक गावांतील पाणीयोजना, रस्ते, झाडं, साकव, पूल, बंधारे, संरक्षक भिंती, स्मशानशेडस् अशा विकासकामांना या अस्मानी संकटाने गिळलं. लेप्रसी हॉस्पिटलसमोरील ब्रिटिशकालीन पूलही दुभंगण्याचा धोका निर्माण झाला. अतिवृष्टी किती तब्बल 100 इंचांपेक्षा जास्त! भूस्खलन किती? तेही हजारो एकरामध्ये! महापुरामध्येही सडवलीतील म्हातारी वाहून गेली तर कोतवाल खुर्दमध्येही तसंच झालं… शेजारच्या महाड तालुक्यातील दासगांव, रोहन, जुई-कोंडीवते या गावांत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. पण, पोलादपूरंच स्वत:च्या दु:खामध्ये होतं. त्यामुळे कोण दुसऱ्याच्या दु:खावर फुंकर घालणार?
यानंतर सामाजिक संघटना, मानवप्रेमी संघटना, मंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, मंत्री जयंत पाटील यांच्याकडून दूधपुरवठा, सरकारी पंचनामे, सरकारी मदत, सार्वजनिक मालमत्तेची हानी मोजणी, भूस्खलनाची कारणमीमांसा, जखमींना मदत, मृतदेह शोधण्याचे काम सुरू, मृतांच्या नातेवाईकांना मदत, रस्ते अन् घाट मोकळा करण्याचे प्रयत्न, मोफत रॉकेल पुरवठा, साखर, तांदूळ व घरगुती वस्तूंचे वाटप, पूरग्रस्त व दरडग्रस्तांची जगण्याची धडपड पुन्हा सुरू झाली. काहींना उगीचच मदत लाटली तर काहींनी वस्तूरुपी मदत देण्यास विरोध दर्शविला.
25 आणि 26 जुलै 2005 न विसरता येणाऱ्या घटनाक्रमांचा काळ आणि केवळ काळच जो पोलादपूर तालुक्यात दोन दिवस ठाण मांडून तब्बल दहा जणांचे बळी घेणारा ठरला. अनेकांचे संसार उघड्यावर आणले. आता सर्व आठवणी मनात घर करून आहेत. पण, धास्ती कायमच आहे. कोतवाल खुर्द व कोंढवीसह अनेक गावांमध्ये दरडग्रस्तांना घरकुलं देण्याची पूर्ण सज्जता झाले आहे. आधार संस्था असो वा सिध्दीविनायक अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला. स्वत:चं घर मिळण्यास विलंब झाल्याने काही पुन्हा दरडग्रस्त घरामध्ये राहू लागले आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या सरकारी अहवालामध्ये सर्व सत्य मांडले आहे. आपत्ती निवारण कायदा 2007 निर्माण झाला, पण सरकारी अधिकाऱ्यांना त्याची धास्ती दिसत नाही.





