कामगारांना प्रशासनाचे लेखी आश्वासन
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायतीमधील कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केले होते. गणेशोत्सव असल्याने कामगारांच्या संघटनेची मनधरणी करण्यात नेरळ ग्रामपांचायतचे प्रशासन यशस्वी ठरले आहे. कामगारांचे मागण्यांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.
कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे माहापालिका कर्मचारी कामगार संघटना यांचे युनिट स्थापन केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून कामगार आपल्या मागण्यासाठी अनेक महिने पाठपुरावा करीत आहेत. कामगारांनीं कामबंद आंदोलन सुरु केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. तब्बल 60 कामगार त्यात जास्त कायमस्वरूपी सेवेत असलेले कामगार यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला होता.
मनसेच्या पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांना सरपंच उषा पारधी आणि ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी पाचारण केले.त्यानंतर तेथे सविस्तर चर्च झाली. त्यात कामगारांच्या प्रमुख मागण्यांपैकी मासिक वेतन हे दर महिन्याचे 10 तारखेला करण्याचे लेखी करण्यात आले. त्याचवेळी पीएफ आणि कर्जाचे थकीत हप्ते संबंधित बँकेसोबत बैठक घेऊन मार्च 2023 पूर्वी पूर्ववत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मासिक पगाराची स्लिप यापुढे कायमस्वरूपी सर्व कामगारांना देण्यात येणार असून मागील पाच महिन्याची स्लिप देखील देण्यात येणार आहे असे प्रशासनाने मान्य केले. तर आरोग्य विभागातील मुकादम पदावर सेवा जेष्ठतेनुसार बढती देण्याची मागणी होती,त्यानुसार अनंता दामा भला यांना बढती देण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आले. कामगारांच्या कामबंद आंदोलनानंतर ग्रामपंचायत प्रशासनांकडून देण्यात आलेल्या आश्वासन पत्रावर सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या साह्य आहेत. या पत्राने समाधानी झाल्यानंतर सर्व कामगारांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले.