पुणे-मुंबई मनपाची वॉर्ड पुनर्रचना जैसे थे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुणे आणि मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मविआ सरकारने मुंबईसाठी 236 वॉर्ड केले होते. मात्र, सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीसांनी याची संख्या कमी करुन 227 वॉर्ड करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने शिवसेनेला दिलासा देत शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका दिला आहे.

दरम्यान, वॉर्ड रचनेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले की, गेल्या अधिवेशन काळात मुंबईतील 227 वॉर्ड 236 का करण्यात आले याचे समर्थन मविआ सरकारमध्ये नगरविकास मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी जनगणनेची आकडेवारी देत लोकसंख्या कशी वाढली आहे आणि त्यामुळे वॉर्ड संख्या 227 न ठेवता 236 करणे क्रमप्राप्त असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर सभागृहाने याला मंजुरी दिली होती. मात्र, नव्याने सत्तेत येताच असा घुमजाव करणं याला आम्ही आव्हान दिले होते. या सर्व बाबींचा अभ्यास करून न्यायालयाने 227 वॉर्ड करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, यावरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होणार आहे. त्यावेळी यावर अंतिम निर्णय मिळेल असे देसाई यांनी सांगितले.

Exit mobile version