| चौक | वार्ताहर | पोलिसांच्या मदतीने स्वतःच्या मालकीची जमीन पटेल इंजिनिअरिंग कंपनी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी यांनी केला आहे. शेतकर्यांनी याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना रजिस्टर पोस्टाने कळविले असून, न्याय मागितला आहे. मात्र, अद्यापही नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी प्रतिसाद न दिल्याने शेतकरर्यांनी कुणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पटेल इंजिनिअरिंग यांचे कृष्णा घोष व बाबासाहेब घोरपडे हे प्रतिनिधी गावगुंडांच्या व पोलिसांच्या माध्यमातून जमीन बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी रामचंद्र निंबाळकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, गृह राज्यमंत्री व पोलीस महासंचालक यांना लेखी कळविले असून, न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. मात्र, त्यांच्या पत्राची दखल ना आयुक्त, ना गृहमंत्री, ना मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने घेतली, त्यामुळे शेतकरी चिंतातूर होऊन गप्प बसले आहेत. या जमिनीची भूमिअभिलेख यांच्याकडूनही रीतसर मोजणी झाली आहे. त्यातही कुठेही वाद अथवा हरकत नाही किंवा मूळ मालक अथवा विद्यमान मालक यांनी कुणाशीही व्यवहार केला नसताना ही जमीन बलकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने स्थानिक शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनीच ठोकले टाळे – रामचंद्र भिवा निंबाळकर, रा. उसरली बु., ता. पनवेल यांची जमीन बारवई येथे स.नं. 37/1/अ क्षेत्र 1.23.60 ही जमीन पूर्णपणे मालकीची असून, त्यात कुणाचाही हक्क अथवा दावा नाही. लगतच पटेल इंजिनिअरिंग यांचीही जमीन आहे. पनवेल तालुका पोलिसांनी येऊन आतमधून गेटला टाळे लावल्याने शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. उलट, शेतकर्यांनी त्याच्या मालकी हक्काच्या जमिनीत जाऊ नये, असे पत्र दिले आहे.
- पोलीस, गावगुंड व कायदा यांची भीती दाखवून शेतकर्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न झाल्यास कोकणातील शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे स्थानिक शेतकरी जगविण्यासाठी पोलिसांनी मदत करावी. – शेतकरी