। मुंबई । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहूमत मिळूनही महायुती सरकारचा मुख्यमंत्री ठरण्यास खूप वेळ गेला. यानंतर तब्बल 23 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आता बिनखात्याच्या मंत्र्यांना 8 दिवसांनी खाते देण्यात आले आहे. या खातेवाटपात शिंदेंच्या हाती निराशाच लागली आहे. गृह खाते मिळावे म्हणून शिंदे अडून बसले होते. मात्र, अखेर हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच कायम ठेवले आहे. तर, अर्थ खाते पुन्हा अजित पवार यांना मिळाले असून गृह आणि अर्थ खात्याच्या तुलनेत कमी वजनदार असलेले तिसर्या नंबरचे नगरविकास, गृहनिर्माण खाते शिंदेंकडे कायम आहे. यातच आता महायुतीत पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
शनिवारी खातेवाटप जाहीर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर, रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवार गटात स्पर्धा असल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे याआधी येथील पालकमंत्रीपद होते. मात्र, आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हेही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. यातच बीडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळू शकते. येथून भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुती पालकमंत्रीपदे लवकरच जाहीर करणार की, यालाही दिरंगाई होणार, हे पाहावे लागणार आहे.