। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अतिउत्साही पर्यटक जिवावर बेतून समुद्राच्या पाण्याशी खेळ करतात. त्यामुळे अनेकजणांना जीव गमवावा लागला आहे. अनेकदा मद्यधुंद होऊन तर कधी स्टंट करण्याच्या नादात हे असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शनिवारी काशिद समुद्रकिनारी गेलेल्या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मुळचे राहणार वेस्ट बंगाल, सध्या रा. श्री गुरू गोल्ड, सोन्या मारूती, पुणे येथील पलट्टू सूत्रधार (वय-35) व सुरजित नस्कर (वय- 25) यांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीवरक्षकाला यश आले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. लवकरच याबाबतची सविस्तर माहिती घेण्यात येईल.







