खो-खो स्पर्धेचा अंतिम थरार

कुमारांमध्ये ठाणे वि. पुणे तर, मुलींमध्ये उस्मानाबाद वि. नाशिक भिडणार

| रोहा | वार्ताहर |

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित 48 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार गटात ठाणे विरुद्ध पुणे तर मुलींमध्ये उस्मानाबाद विरुद्ध नाशिक असे अंतिम सामने होणार आहेत. धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम.बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर सामने सुरु आहेत.

मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने ठाण्यावर 10-9 अशी 8.20 मि. राखून एक गुणाने दणदणीत मात केली. उस्मानाबादच्या अश्‍विनी शिंदे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले यांनी चांगला खेळ करत मोठा विजय मिळवून दिला. ठाणेच्या दिव्या गायकवाड, पायल भांगे यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात नाशिकने सांगलीवर चुरशीच्या सामन्यात 13-12 (मध्यंतर 7-6) असा एक गुणाने निसटता विजय मिळवला. मध्यंतराला घेतलेली एक गुणाची आघाडीच नाशिकला तारुण गेली. नाशिकतर्फे सोनाली पवार, निशा विजल, दीदी ठाकरे, वृषाली भोमे यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत सांगली वर मात केली. त्यामुळे अंतिम सामन्यात पोचण्याची सांगलीचे स्वप्न अपूर्ण राहीले. सांगलीतर्फे प्रगती कर्नाळे, सानिया निकम, प्रतीक्षा बिराजदार यांनी दिलेली निकराची लढत अपूर्ण पडली.

कुमारांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने अहमदनगरचा 14-10 असा एक डाव 4 गुणांनी धुव्वा उडवला. पुणे संघाने नावाला साजेसा खेळ केला. पुण्याकडून विनायक शिंगाडे, विवेक ब्राह्मणे, आकाश गायकवाड, देवांग गादेकर यांनी उत्कृष्ट खेळ करत नगरच्या खेळाडूंना संधी दिली नाही. नगरकडून अथर्व निकम, शिवम नामदले यांनी चांगला खेळ केला.

कुमारांचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना ठाणे विरुद्ध उस्मानाबाद हा प्रेक्षणीय झाला. ठाण्याने उस्मानाबादचा 19-15 (मध्यंतर 11-9) असा 4 गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान पटकवलं. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये आक्रमण आणि संरक्षण यांचा उत्तम ताळमेळ पाहायला मिळाला. ठाण्याचा मयुरेश मोरे, सूरज झोरे, रुपेश कोंढाळकर, वैभव मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात उस्मानाबाद संघाने ठाण्याला चांगलेच झुंजवले, मात्र दुसर्‍या डावात ठाण्याने सावरले. उस्मानाबादतर्फे किरण वसावे, श्रीशंभो पेठे, रवी वसावे यांनी चांगली लढत दिली.

Exit mobile version