धक्कादायक! अतिवृष्टीमुळे घरांची भिंत कोसळली

आई व दोन मुले जखमी; जखमींवर नवी मुंबई रुग्णालयात उपचार सुरू
। उरण । वार्ताहर ।

अतिवृष्टीमुळे करंजा सातघर येथील रहिवाशांच्या राहत्या घरावर कंम्पाऊंडची भिंत पडल्याची घटना मंगळवारी ( दि १२) रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा सातघर येथील रहिवासी महेंद्र पाटील यांच्या राहत्या घरांवर अतिवृष्टीमुळे कँम्पाऊंडची भिंत पडल्याची घटना घडली. सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने घरातील बेडरूममध्ये झोपलेल्या संगिता महेंद्र पाटील व कुणाळ, दिपेश ही दोन मुले गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सदर जखमींवर नवी मुंबई येथील डि.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, तलाठी तेजस चौरले, मंगेश थळी यांनी घटनास्थळी भेट देऊन जोखमीची विचारणा करुन नूकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीने उपचार व मदत मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी प्रशासनाकडे केली आहे

Exit mobile version