। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
आषाढी एकादशी वारीची परंपरा ही सुमारे 800 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा जपत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नसून वारकर्यांच्या मुखात केवळ पंढरीच्या पांडुरंगाचा आणि विठ्ठलनामाचे स्मरण, गजर अखंडित सुरु असतो. नवी मुंबईतून पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठया संख्येने वारकरी जात असतात, तर विविध धार्मिक भक्त मंडळीकडून आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घडवीले जाते. ही परंपरा आजही अखंडित सुरूच असल्याच्या भावना विजय नाहटा यांनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या.
नवी मुंबईतील वाशी, नेरुळ, बेलापूर, तुर्भे आग्रोळी, करावे गांव, सानपाडा आदी विविध ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने विजय नाहटा फाउंडेशनच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेरुळ मध्ये श्री विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्था आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या सहकार्याने दिलीप घोडेकर यांनी विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन भाविकासाठी केले होते.