12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना अडकली लालफितीत
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायकांपैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पुरविले जाते. दोन-तीन दिवसांपासून अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले आहे. परिणामी, पालीकरांना माती व चिखलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालीतील तब्बल 15 हजारांहून अधिक लोक अंबा नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व वापरासाठी करतात. शोकांतिका म्हणजे, पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यःस्थितीत तब्बल 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना लालफितीत अडकली आहे. ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे. सध्या अंबा नदीच्या पाण्यात गाळ व चिखलाचे प्रमाण अधिक वाढले आहे. तर नंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ व शेवाळ असते. कधीकधी साप, मासे, शिंपले नळाद्वारे थेट येतात. तसेच नाले व गटारांमधील प्रदुषित सांडपाणी, रासायनिक कंपन्यांमधील टाकऊ रसायन हे आंबा नदीत सोडले जाते. या बरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला कपडे व भांडी धुतात. तसेच नदीत निर्माल्यदेखील टाकले जाते. यामुळे अंबा नदीचे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित व खराब होते. या सर्वांमुळे पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. असे पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी बहुसंख्य नागरिक अधिकचे पैसे खर्च करुन पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत.
वारंवार पाणीटंचाईचे सावट
अंबा नदीजवळील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून सर्व पालीत पाणी पुरवठा केला जातो. तर काही भागात नदीतून थेट पाणी पुरवठा केला जातो. मात्र जॅकवेल ते साठवण टक्या यांच्या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणार्या लहान, जुन्या व जिर्ण झालेल्या जलवाहिन्या, साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुर्या क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहिन्या, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाई भेडसावते. नळपाणी योजना झाल्यास ही समस्या निकाली निघू शकते.
- ही योजना माझ्या काळातील नाही. नगर पंचायत प्रशासक म्हणून ही योजना अंमलात आणण्यासाठी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आम्ही त्यांना यासाठी सर्व सहकार्य करू. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे – दिलीप रायण्णावार, प्रशासक, नगरपंचायत पाली