| उरण | प्रतिनिधी |
उरण ते नेरूळ-बेलापूर रेल्वेमार्गावरील जासई ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण स्थानकाचे काम अर्धवट असून धीम्यागतीने सुरू आहे. या स्थानकातील फलाट, जिने इतर कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे जासईकरांना खासगी वाहनांचा वापर करून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जासईकरांकडून करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेकडून नेरूळ ते खारकोपर ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र उरणकरांना उरण रेल्वे सेवेची प्रतीक्षा होती. अनेक अडथळ्यांनंतर अखेर उरण रेल्वे सेवा सुरू झाली. रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र आजही उरण रेल्वे अंतर्गत अनेक स्थानकांची कामे प्रलंबित आहेत. यामध्ये खारकोपरनंतर पहिलेच स्थानक असलेल्या गव्हाणचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
स्थानकाचे काम पन्नास टक्के अपूर्ण आहे. या स्थानकासाठी जासई आणि आजूबाजूच्या गावांतील जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गावरील जासई एक प्रमुख गाव आहे. गावची लोकसंख्या मोठी असून बहुतेक करून चाकरमानी मुंबई, नवी मुंबईमध्ये कामानिमित्त ये-जा करतात. येथील अनेक विद्यार्थी मुंबई, पनवेल, नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येजा करत असतात. मात्र स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने त्यांना खासगी वाहनांनी मुंबई, नवी मुंबईकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जासई परिसरातील प्रवाशांची वाहतुकीसाठी महत्त्वाची साधन असलेली एनएमएमटी सेवा बंद झाल्याने अनेक अडचणी त्यांना येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर गव्हाण रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी जासईकर करत आहेत. स्थानकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे संकेत सिडकोच्या सूत्रांकडून देण्यात येत आहेत. काही अडथळे होते ते दूर होऊन कामे जोरदार सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होईल. असे सेंट्रल रेल्वे अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले.







