। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ-माथेरान हा घाटरस्ता वाहनांसाठी अवघड असा रस्ता समजला जातो. पूर्वी एकेरी मार्ग असताना हा रस्ता वाहनचालकांसाठी कसोटीचा समाजाला जात होता. मात्र, राज्य सरकारच्या कोकण पॅकेजमधून रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु झाले आणि नंतर हा रस्ता काही प्रमाणात वाहनचालकांसाठी सुरक्षित झाला. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नेरळ-माथेरान घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात वाहनाच्या सुरक्षेसाठीची कामे करण्यात आली आहेत. अजुनही खासगी गाड्यांना हा रस्ता सुरक्षित वाटण्यासाठी या ठिकाणी संरक्षण भिंतींचे जाळे उभारण्यात आले असून हा घाटरस्ता आता सुरक्षित समजला जात आहे. मात्र, या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या डोंगर कड्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात अतिशय धोकादायकल समजला जातो. त्यामुळे या घाटरस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संरक्षण जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडून सतत शासनाकडे करण्यात येत होत्या. त्यामुळे आता महत्वाच्या दोन ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाले असून दरडी रोखण्यात यश आले असल्याचे बोलले जात आहे.