| माणगाव । वार्ताहर ।
गणेशोत्सव अवघ्या 12 दिवसावर ठेपला असताना महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे गणेशभक्तांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागणार आहे. त्यातच माणगाव व इंदापूर शहराचे बायपासचे काम रखडल्याने या कामाचे तीनतेराच वाजले आहेत.
कोकणासह तळकोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणार्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही पर्यटक मोठया प्रमाणात येतात, तसेच या मार्गाने प्रवासीही मोठ्या संख्येने प्रवास करतात. या मार्गाच्या कामाची गेली दहा वर्षांपासून चांगलीच रखडपट्टी सुरु आहे. माणगाव व इंदापूर शहरात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे.
तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता काढला असून या बायपास मार्गाचे काम सहा वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले जात आहे. त्यातच वैयक्तिक मालकी जमीनीच्या कांही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे बायपासचे काम रखडले आहे. त्यामुळे यंदाचे वर्षी कोकणात जाणार्या गणेशभक्तांना या अपूर्ण बायपासच्या कामाचा फटका बसणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 3 एप्रिल रोजी इंदापूर येथील कार्यक्रमात महामार्गाच्या रस्त्याचे काम एक वर्षात पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती.मात्र वन, रेल्वे खात्याची मंजुरी मिळाली नसल्याने हे काम रखडले आहे.
कोकणच्या विकासाला अडथळा निर्माण करणार्या महामार्गाचे रुंदीकरण हे महत्वाचे असून, कोकणाचे मुख्य प्रवेशद्वार समजले जाणार्या इंदापूर-माणगाव या महत्वाच्या शहराजवळून जाणार्या बायपास रस्त्याचे तीन-तेरा वाजल्याने कोकणवासियातून प्रचंड नाराजी प्रसरली असून प्रवासी नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. यासणासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणाकडे येत असतात. या चाकरमान्यांचा प्रवासात विघ्न येऊ नये यासाठी या मार्गावरील खड्डे तातडीने चांगल्या प्रकारे बुजवा.
पंकज तांबे
अध्यक्ष, बौद्ध धम्म सामाजिक विकास संस्था