तहसीलदार घारे यांचे आवाहन
। म्हसळा । वार्ताहर ।
कृषीप्रधान देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले. कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती म्हसळा आणि तालुका कृषी विभाग म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती म्हसळा या सभागृहात कृषीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जि.प.चे माजी कृषी आणि दुग्धव्यवसाय सभापती बबन मनवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार समीर घारे, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, गटविकास अधिकारी नरेश गायकवाड, जि.प. कृषी अधिकारी मंगेश साळी, तालुका कृषी अधिकारी गावडे, कक्ष अधिकारी हेमंत माळी, मांदाटणे सरपंच चंदू पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. कळम्बासकर, इंदुलकर, बाक्कर, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आदि मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार समीर घारे यांनी व्यवसाय आणि नोकरी यांची तुलना करताना शेती व्यवसाय निश्चितपणे श्रेष्ठ असल्याचे सांगितले. शेती विकासासाठी शासनाकडून 100 टक्के अनुदान, बी बियाणे, वेगवेगळी अवजारे आणि शेतीसाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामुग्री मोफत अगर सबसिडीवर मिळतात, त्याचा फायदा शेतकर्यांनी विशेषतः तरुणांनी उठविणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. अजून वेळ गेलेली नाही, तरुणांनी कृषीप्रधान देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊन देश सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले. यानिमित्ताने पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सहाने यांनी केले.