उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील चिरनेर येथील मामाश्री गोदामातून कोट्यवधी रुपये किमतीच्या सात कंटेनरची चोरी झाली आहे. हा प्रकार गोदामात काम करणार्या मार्केटिंग व्यवस्थापक अलिम शेख याने केल्याचा आरोप गोदामाचे मालक अरविंद मांगिलाल गेहलोत याने केला आहे. गोदामातून कस्टम बॉण्डेड एक कोटी 38 लाख 74 हजार 240 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल माल चोरी झाला आहे.
जेएनपीटी बंदरातील आयात-निर्यात माल साठविण्यासाठी उरण तालुक्यात अनेक गोदामे तयार झाली आहेत. मात्र यात कोणता माल, शस्त्रास्त्रे, स्फोटके आहेत, याची माहिती सुरक्षा यंत्रणांना नसते. चिरनेर येथील मामाश्री गोदामातून जून महिन्यात ही चोरीची घटना घडली आहे. गोदामातून शेरलीन कंपनीच्या कॅनव्हास शूज, मॅजिक क्यूब, बेबी करेज, फुटस्क्रबर, प्लास्टिक सोप बॉक्स, कॉस्मेटिक, क्रीम आदी सुमारे एक कोटी 38 लाख 74 हजार रुपये किमतीच्या मालाचा अपहार झाला आहे.
अलिम शेख याने मामाश्री गोदामातील पावत्या व इतर कागदपत्रे चोरीने घेऊन हे सात कंटेनर बाहेर काढण्यासाठी लागणारी कस्टमची परवानगी मिळवली होती. त्यानंतर त्याने कंटेनर गोदामातून बाहेर काढले. याची कुणकूण कंपनी मालकाला आणि कस्टम विभागाला लागल्यानंतर त्यांनी कंटेनर मालासह परत देण्याचे कबूल केले. त्यातील 350 कार्टेज परत दिले; मात्र माल ठेवलेल्या पार्ट्यांना त्यांचा माल न मिळाल्याने कस्टम विभागाच्या अधिकार्यांनी तपासणी केली. तेव्हा मालाचा अपहार झाल्याचे उघड झाले. कंपनीचे मालक अरविंद गेहलोत यांनी याबाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहेत.