उरणमध्ये विजेचा लपंडाव

शहर तसेच ग्रामीण भागांतील नागरिक संतप्त

| उरण | वार्ताहर |

उरण शहर आणि ग्रामीण भागात वारंवार वीज गायब होत आहे. एकीकडे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

उरण शहर आणि ग्रामीण भागात बहुतांशी परिसरात विजेचा नेहमीचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे महावितरण कंपनीच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पोलखोल झाली आहे. मागील आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून विजेची आवश्यकता आहे. मात्र त्याचवेळी उरण तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. बोकडवीरा गावातील वीज अनेकदा वारंवार ये-जा करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात महावितरणच्या उपअभियंत्यांना विचारणा केली असता झम्पर जात असल्याचे कारण त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महावितरणच्या पनवेल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी या स्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही.

सोमवारी उरण शहरातील आनंद नगर, बोरी आदी भागांत अनेक तास वीज गायब झाली होती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उरणमध्ये सध्या अनेक ठिकाणी उंच इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या चढ-उतार कराव्या लागला. त्याचप्रमाणे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याचीही तयारी सुरू आहे. मात्र वीज सातत्याने ये-जा करीत असल्याने या तयारीवर परिणाम झाला आहे. गणपती कारखाने व व्यावसायिकांनाही फटका बसत आहे.

Exit mobile version