। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावरील साई मंदिर ते बोपेले गावाकडे जाणारा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर मंजूर असलेले काम वेळेत सुरू केले नाही आणि त्यामुळे खड्डेमय रस्ता कायम आहे. दरम्यान याच रस्त्याच्याकडेने कोल्हारे ग्रामपंचायतकासून पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम केले आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
धामोते कोल्हारे येथील साई मंदिर नाका येथून तळवडे पिंपलोळी आणि पुढे गुडवण सुगवे असा रस्ता जात असतो. या रस्त्यावर तीन टप्प्यात डांबरीकरण आणि काँक्रिट करणाची कामे शासनाने मंजूर केली आहेत. या कामांचे भूमिपूजन आ. महेंद्र थोरवे यांनी केले होते आणि त्या रस्त्यावरील बोपेले पासून काळेवाडी पर्यंत बीबीएम डांबरीकरण पूर्ण झाले असून डांबरीकरण होणे बाकी आहे. तर काळेवाडी पासून लोभेवाडी पर्यंत रस्त्यावर डांबरीकरण दोन टप्प्यांत पूर्ण झाले आहे. मात्र याच रस्त्याचा भाग असलेल्या साई मंदिर ते बोपेले गाव या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षे डांबरीकरण झाले नाही आणि त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होऊन बसले आहे. त्यात पावसाळ्यात तर या रस्त्यावर खड्डेच खड्डे आढळून येत असून त्यामुळे वाहनचालक यांना प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे.
या रस्त्यावरील खड्डे हे कोणत्याही वाहनांच्या ये-जा करण्याने आजूबाजूने चालणारे वाटसरू यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत असते. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना वाहनचालकांना त्रास्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे हे पुन्हा सुस्थितीत तयार करण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायतीला निर्देश द्यावेत आणि वाहन चालक यांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी नेरळ एसटी स्टँड येथील जय मल्हार रिक्षा संघटनेचे स्टँड प्रमुख भगवान जामघरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.