रत्नागिरी, रायगड, मुंबईतील 54 गावे अतिसंवेदनशील; भूवैज्ञानिकांचे सर्वेक्षण
| रायगड | वार्ताहर |
काहीच दिवसांनी आता पावसाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत कोकणात दरडी पडण्याची शक्यता असते. कोकणातील शेकडो गावे आज ही दरडींच्या सावटाखाली आहेत. कोकणातील 7 जिल्ह्यांतील 613 गावे दरडप्रवण आहेत. या गावांपैकी 299 गावांचे भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या आजपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील 54 गावे अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत.
सर्वांत जास्त दरडप्रवण गावे असणारा रत्नागिरी जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन जागे झाले असून, सर्व यंत्रणांकडून अहवाल मागवले आहेत. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडत असल्याने अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत. येथे 303 गावे दरडप्रवण असून, 122 गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 5 गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत, 9 गावे मध्यम धोकादायक, 49 गावे कमी धोकादायक श्रेणीत आहेत. 41 गावे चौथ्या तर 18 गावे धोकादायकच्या पाचव्या श्रेणीत आहेत. उर्वरित 181 गावांच्या सर्वेक्षणासाठी 4 ऑगस्ट 2023ला कळविण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
शास्त्रज्ञांनी भेटी देऊन केला सर्व्हे संभाव्य दरडग्रस्त गावांचे पुणे येथील जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांनी दरडप्रवण गावांना भेट देऊन पाहणी केली. डोंगरउतारावरील वृक्षतोड, बेकायदा खोदकाम, पाण्याचा निचरा होणार्या मार्गात अडथळे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभागावरील बांधकाम ही दरड कोसळण्याची प्रमुख कारण असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
धोका कमी करण्यासाठी भूवैज्ञानिकांनी काही उपाय सुचवलेले आहेत. प्रामुख्याने या परिसरातील खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावे, डोंगरउतारावर वृक्ष तोडण्यास मज्जाव करण्यात यावा, पावसाळ्यापूर्वी डोंगरउतारावर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत. डोंगरउतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात आणि दरडरोधक भिंतीची उभारणी करण्यात यावी यांचा समावेश आहे.