शिक्षक प्रसाद साळवी यांचा स्तुत्य उपक्रम
| कोलाड | वार्ताहर |
शाळेला उन्हाळी सुट्टी लागते कधी आणि आम्ही मौज मजा करतो कधी अशी चिमुकल्यांची स्थिती असते. मात्र, याच चिमुकल्यांना अधिक शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून रोहा तालुक्यातील केंद्र शाळा पुगाव येथील कार्यरत असलेले शिक्षक प्रसाद साळवी हे यावर एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा तसेच सुट्टीतील पूर्ण दिवस विनाकारण उन्हात भटकंती करत जाऊ नये, ही भावना शिक्षक साळवी यांनी लक्षात घेतली. त्यांची बुद्धी, कला, तसेच वाचन, विविध गोष्टी यावर लक्ष वेधून त्यांना विरंगुळा म्हणून त्यांची वैचारिक प्रगल्भतेवर भर देऊन एक अनोखं उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ कौतुक करत आहेत.
उन्हाळी सुट्टी म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव की प्राण. मामाच्या गावाला जाणे, खूप फिरणे, उन्हातानातून भटकंती, मोबाईलवर कायम गेम खेळणे, टीव्हीवरील कार्टून पाहणे, साधारणपणे या गोष्टींमध्येच आपली ग्रामीण भागातील मुलं सुट्टीच्या दिवसात अडकलेली दिसतात. पण त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची वैचारिक समृद्धी व्हावी, या सुट्टीमध्येदेखील त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून त्यांचे मनोरंजन देखील व्हावे या भावनेतून आपल्या पुगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रसाद साळवी यांनी हा एक सुट्टीतला उपक्रम सुरू केला आणि त्याचा भरभरून आनंद येथील बालक घेत आहेत.