11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळ संपूनही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता येत्या 12 जुलैला विधिमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. तर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील, काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध या निवडणुकीत कामाला येणार का, हे पाहावे लागेल.
कुणाकडे किती संख्याबळ?
महायुती
भाजप -103 शिंदे सेना - 37 राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 39 छोटे पक्ष - 9 अपक्ष - 13 असे एकूण - 201
मविआ
काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15 राष्ट्रवादी (डझ) - 13 शेकाप - 1 अपक्ष - 1 असे एकूण - 67
एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ आहेत.