राज्यात सत्तापालट होणार- मनोज जरांगे पाटील

| जालना | प्रतिनिधी |

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदललेली असेल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी मराठा आंदोलकांनी संवाद साधला त्यावेळी विधानसभेनंतर मी काय बोललो हे जरांगे पाटलांना कळेल असं राज ठाकरें यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विधानसभेत सत्ताच पलटणार मग काय बोलणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आज जरांगे पाटील हे धाराशिवच्या दौर्‍यावर असून, ते मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. 14 ते 20 ऑगस्टपर्यंत डाटा घेणार आहे. त्यानंतर चर्चा करून 29 ऑगस्टला घोषणा करणार आहे. त्याचबरोबर जिथे जिथे मराठ्यांना त्रास झाला तिथे 100 टक्के हिशोब होणार आहे. रोज आजी माजी आमदार भेटायला येत आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन एका मार्गानं चालणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन उभारलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी सरकारनं स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा नवी डेडलाईन दिली आहे. 29 ऑगस्टला आम्ही भूमिका स्पष्ट करू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version