। पनवेल । वार्ताहर ।
पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे या अशा धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांचा जीव धोक्यात येत असतो. अनेक ठिकाणी या धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 32 धोकादायक इमारती पालिकेने घोषित केल्या आहेत. यापैकी काही इमारतीत आजही रहिवासी वास्तव्यास आहेत. यामगाची काही तांत्रिक कारणेदेखील आहेत. घर सोडले तर राहायचे कुठे? भाडोत्री घराचे भाडे भरणार कसे, असे असंख्य प्रश्न या रहिवाशांना सतावत आहेत.
पालिका क्षेत्रात 32 इमारती पालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. संबधित इमारतीचे पाणी आणि विज कनेक्शन तोडण्याच्या सूचना पालिकेने संबधित विभागाला दिले आहेत. पालिका क्षेत्रात या धोकादायक इमारतीत शेकडो रहिवासी वास्तव्यास आहेत. यामुळे या रहिवाशांचा जीव टांगणीला लागून राहिला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अबालवृद्धांचा समावेश आहे. पालिकेने संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. याव्यतिरिक्त सिडकोच्या क्षेत्रातील शेकडो इमारतींचादेखील समावेश यामध्ये आहे. मात्र, दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
पालिकेने धोकादायक इमारतींसंदर्भात स्थापन केलेल्या कमिटीच्या सर्व्हेनुसार धोकादायक 32 इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.
कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका