30 ते 35 जण गंभीर जखमी
। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या धानीवरी येथे सोमवारी (दि.18) सायंकाळी साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने झडप घातली. 100 हून अधिक वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि भरधाव कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीही चिरडली गेली. या भीषण अपघातात तब्बल 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 ते 35 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापुगाव येथील लाखातपाडा परिसरातील जयराम दांडेकर यांच्या कुटुंबातील साखरपुड्याचे वऱ्हाड आयशर ट्रकमधून धानीवरी खडकीपाडा येथे जात होते. आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 100 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. या वऱ्हाडामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता.
वऱ्हाडाचा हा आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचलाच होता, तितक्यात मुंबई वाहिनीवरून अत्यंत वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक थेट पलटी झाला आणि त्यातील सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. याच दरम्यान एक बाईक देखील या अपघाताच्या कचाट्यात सापडली. हा अपघात एका बाईक, कंटेनर आणि आयशर ट्रक अशा तीन वाहनांमध्ये झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, यात आयशर ट्रकचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक प्रवासी ट्रकमध्ये अडकून पडले होते. तर काही जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस, महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सिल्वासा, वापी आणि वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार 10 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान हा आकडा 13 वर पोहोचला. काही जखमींची प्रकृती अद्यापही अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






