| ठाणे | वृत्तसंस्था |
ईशान्य मुंबईत भाजपच्या पदाधिकार्याला पैसे वाटप करतांना आम्ही पकडले. मात्र, पोलिसांनी उलट आमच्यावरच हल्ला आहे. त्यामुळे ही लढाई भ्रष्टपरिवार, गद्दार विरुध्द सामान्य नागरीक, निष्ठावान यांच्यात होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, गुंडगिरी आहे. आमच्याकडे निष्ठावान सैनिक आहेत. त्यामुळे ठाण्याचा गडच काय कल्याणचा गडही आम्ही राखू असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
ठाणे लोकसभेचे उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे आणि कल्याणच्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाणे आणि कळवा, खारेगाव भागात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आदीत्य ठाकरे सहभागी झाले होते. तसेच त्यांच्या समवेत वरुण सरदेसाई, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. आदीत्य ठाकरे यांनी सकाळी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर ते कळवा, खारेगाव या भागात गेले व प्रचार रॅलीत सहभागी झाले. ठाण्याचे उध्दव ठाकरे सेनेचे उमेदवार राजन विचारे यांची देखील बाईक रॅली काढण्यात आली. शक्तीस्थळापासून या रॅलीला सुरवात झाली.त्यानंतर महागिरी, सिडको, शांतीनगर, वागळे चेकनाका, साठे नगर, इंदिरानगर नाका, अंबिका नगर, राम नगर, यशोधन नगर, शास्त्रीनगर नाका, शिवाई नगर, वर्तकनगर नाका, लुईसवाडी, हाजुरी, बी कॅबीन, गोखले रोड, तीन पेट्रोल पंप आदींसह शहराच्या विविध भागातून ही बाईक रॅली गेली.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना शनिवारी प्रचाराच्या तोफा थंड होण्या अगोदर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोरदार प्रचार सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, ठाण्यातील टीप टॉप प्लाझा हॉटेल या ठिकाणी महायुतीचा मेळावा पार पडणार होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यात संबोधीत करणार होते. मात्र मेळाव्या आधी उध्दव सेनेची प्रचार रॅली या हॉटेलच्या बाजूने जात असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रचार रॅलीत स्वत: राजन विचारे देखील प्रचारासाठी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.