। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे येथील बार्टी या संस्थेमार्फत घेण्यात आलेली विद्यार्थी निवड परीक्षा लोटून माहिना उलटून गेला. तसेच प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख होऊनही पंधरा दिवस झाले. मात्र अद्यापही या परीक्षेचे बार्टीने निकाल न लावल्याने प्रशिक्षणास विद्यार्थी अद्याप रुजू होऊ शकले नाही.
बार्टीने प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा घेतली. याचा निकाल लावून प्रशिक्षण 17 ऑगस्ट 2022 ला सुरु होणार, अशी माहिती देखील बार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार राज्यात 30 प्रशिक्षण केंद्रांवर 23 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु अद्याप या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. अनेक वर्षापासून हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. या आधीच्या काळात साधारणतः परीक्षेच्या नंतर 7 दिवसाच्या आत निकाल लावून जाहीर वेळेत आणि तारखांमध्ये प्रशिक्षण सुरु होण्याची पद्धत होती. मात्र सध्या बार्टीच्या प्रशासनामध्ये हजारो विद्यार्थ्यांना फक्त वेठीस धरण्याचा प्रकार घडून येत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
हे प्रशिक्षण कार्यक्रम नियमित आणि कालबद्ध पद्धतीने चालावे, याकरिता महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयात प्रत्येक वर्षाचे वार्षिक नियोजन आखून दिले आहे. त्या शासन निर्णयामध्ये मे -2022 मध्ये हे प्रशिक्षण सुरु करण्याचे आदेश आहेत. परंतु बार्टीच्या अधिकार्यांनी सप्टेंबर सुरु होऊनही परीक्षेचा निकाल अद्याप लावला नाही. त्यामुळे 23 हजार विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.