आई सरपंच अन् तीन मुलांना घरकुल मंजूर
। गुहागर । प्रतिनिधी ।
पंतप्रधानांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुल योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा खरोखरच सर्वसामान्य व्यक्तींना लाभ मिळतो का असा प्रश्न आता पडू लागला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गुहागर तालुक्यातीत महामार्गावर वसलेल्या व बाजारपेठ नसलेल्या एका गावातील विद्यमान सरपंच असलेल्या एकाच कुटुंबातील तीन भावांना एकाच वेळी घरकुल मंजूर झाल्याने सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे.
गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सध्या महिला सरपंच आहेत. त्यांच्या तीन मुलांना नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या यादीप्रमाणे तीनही मुलांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यामुळे सध्या हा विषय खूप चर्चेचा बनला आहे. आई सरपंच आणि तीन मुलांना घरकुल कसे काय मिळू शकते, याबाबत सध्या एकच चर्चा सुरू आहे.
या संदर्भात या गावातील काही ग्रामस्थांनी गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार काय आहे? एकाच कुटुंबातील तीन भावांना एकाच वेळी घरकुल मंजूर होते का? असे अनेक प्रश्न पडले आहेत. या प्रकरणाबाबत शेखर भिलारे यांनी असे सांगितले की, विस्तार अधिकारी यांना संबंधित प्रकरणाची पडताळणी करून कोणत्या नियम आणि अटीच्या आधारे हे घरकुल मंजूर झाले आहेत. त्याची संपूर्ण चौकशी करून कागदपत्रांचा अहवाल तपासून सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. मात्र, या तिन्ही भावांनी आपल्याला घरकुल मिळावे यासाठी वेगवेगळे रेशनकार्ड काढले असावेत, अशीही जोरदार चर्चा सुरु आहे.