कसारा घाटात भरधाव कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

। नाशिक । प्रतिनिधी ।

कसारा घाटाजवळील मुंबई- नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. 2) रात्री दहाला हॉटेल ऑरेंजजवळ झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.या दुर्घटनेत रियाज हासियत अली, आसादुला अली आणि अफजल बैतुलहा रा. उत्तर प्रदेश या तिघांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारने घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने तब्बल तीन वेळा पलट्या मारल्या. अपघात एवढा भीषण होता, की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी महामार्ग सुरक्षा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कसारा पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून कसारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित व सहायक पोलीस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Exit mobile version