। म्हसळा । वार्ताहर ।
पी.एम. किसान ई केवायसी सात सप्टेंबरपर्यंत करणे गरजेचे आहे, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे. म्हसळा तालुक्यात पी.एम. किसान योजनेचे 6719 लाभार्थी असून, यापैकी 4317 लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तथापि 2393 लाभार्थ्यांची ही केवायसी करण्याची शिल्लक आहे.
दरम्यान, सर्व ग्रामपंचायतींना शिल्लक लाभार्थ्यांचे याद्या दिल्यानंतर सदरच्या याद्या ग्रामसभेत वाचून त्यामधील मयत, बाहेरील राज्यातील किंवा अन्य राज्यातील असल्यामुळे अपात्र असणारे लाभार्थी कमी करण्यासाठी त्यांच्या ग्रामसभेतील ठरावासह यादी या कार्यालयाकडे देण्याबाबत गटविकास अधिकारी यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याकडून 1195 लाभार्थी अपात्र असण्याचे कळवले आहे. त्यानुसार उर्वरित 1198 लाभार्थ्यांना याद्वारे कळविण्यात येते, की त्यांनी त्यांचा पीएम किसान योजनेचा लाभ बंद होऊ नये यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या सीएसी सेंटरमध्ये जाऊन त्यांचीही केवायसी पूर्ण करून घ्यावी अन्यथा शासनामार्फत त्यांना देण्यात येणारा लाभ बंद करण्यात येईल. तरी, गणेशोत्सव कालावधीत म्हसळा तालुक्यातील सर्व नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील पात्र लाभार्थी यांची ई केवायसी सात सप्टेंबरपर्यंत करून घ्यावी, असे आव्हान तहसीलदार समीर घारे यांनी केली आहे.







