आरोग्यमंत्र्यांनी दिला धोक्याचा इशारा
| मुंबई | वृत्तसंस्था |
गुरुवारी राज्यात 36 हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून, आपण आता हळूहळू तिसर्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करणं गरजेचं असून, जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारादेखील टोपे यांनी दिला आहे.
मास्क नसेल तर दंड करा, गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकार्यांना दिले जातील. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्यावेळेत लोकांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही, त्यावेळेत निर्बंध आणता येईल का याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाणार असून, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मात्र, भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असा इशारा टोपे यांनी दिला आहे.
फक्त लसच वाचवेल!
राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, 10 तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा. या महामारीतून नागरिकांना फक्त लस वाचवेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. लसीकरणामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असून, पूर्वीपेक्षा कमी रुग्णसंख्या आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.