। अलिबाग । वर्षा मेहता ।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. त्यातच दिवाळी उंबरठ्यावर असतानाच एसटी कामगारांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 27 ऑक्टोबरपासून आर्थिक आणि प्रलंबित महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरु होणार असल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातील निवेदन संयुक्त कृती समितीच्या वतीने विभाग नियंत्रकांना सोमवारी (दि. 25) देण्यात आले. मात्र, शासनाने सोमवारी उशिरा त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर केल्याने कर्मचार्यांचे उपोषण होणार की नाही, याबाबत मंगळवारी (दि.26) दुपारी निर्णय होणार असल्याची माहिती रायगड कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास खोपडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असून, अनेक मागण्या प्रलंबित असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत उपोषण करण्याचा निर्णय कर्मचार्यांनी घेतला होता. मात्र, दिवाळीत प्रवाशांचे हाल होऊ नये, याकरिता शासनाने महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ केल्याचे जाहीर केल्याने हे उपोषण होणार की नाही, याकडे जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.