आक्षी, सागरगड, सासवणेतील रस्त्यांची कामे मंजूर
| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटन व धार्मिक स्थळाच्या दृष्टीने महत्वाची असणारी अलिबाग तालुक्यातील आक्षी, सागरगड, सासवणे या ठिकाणी प्रादेशिक पर्यटनातून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या गावांमध्ये पर्यटन वाढीला चालना अधिक मिळण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील आक्षी हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. सुंदर असा लाभलेला समुद्रकिनारी व नारळी पोफळीच्या बागा, पर्यटकांसाठी वेगवेगळ्या असलेल्या सुविधांमुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी प्रचंड असते. त्यात आक्षीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल, कॉटेजेस असल्याने घरगुती पध्दतीने पर्यटकांना भोजनाचा आस्वाद घेता येतो. शनिवार, रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटक या पर्यटन स्थळांना आवर्जून भेटी देतात. तसेच सासवणे हे मांडवा बंदराच्या लगत असलेले गाव आहे. या गावाच्यालगत सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. सागरगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात सुंदर असा धबधबा पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरला आहे. आक्षी, सागरगड, सासवणे या ठिकाणी पर्यटनांची संख्या अधिक वाढवी. यातून स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले व्हावे यासाठी आमदार जयंत पाटील यांनी सरकारकडे पाठपुरावा करीत सासवणे, आक्षी, 1सागरगड माची या ठिकाणी प्रादेशिक पर्यटनातून निधी उपलब्ध करून रस्त्यांची कामे करावी, अशी लेखी मागणी 23 डिसेंबर 2022 रोजी केली होती. या मागणीची दखल घेत खंडाळे येथील सागरगड माची पोहोच रस्ता, आक्षी साखर येथील रस्ता, सासवणे येथील रस्त्यांसाठी निधीला मंजूरी देण्यात आली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत विकास कामाला मंजूरी मिळाल्याने लवकरच या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
सागरडमाची हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ आहे. या परिसरात आदिवासी, ठाकूर, गवळी समाज मोठ्या संख्येने आहे. आ.जयंत पाटील यांच्या पुढाकाराने हा रस्ता होणार असल्याने नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. तसेच पर्यटन वाढीला देखील चालना मिळणार आहे.
अशोक थळे, उपसरपंच, खंडाळे ग्रामपंचायत
आक्षी हे पर्यटनाचे ठिकाण आहे. येथे हजारो पर्यटक येतात. आ.जयंत पाटील यांनी पाठपुरावा करून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून येथील रस्त्यासाठी निधी मंजूर केला. या रस्त्यांमुळे पर्यटन वाढीला गती मिळणार आहे. तसेच रोजगारदेखील वाढणार आहे.
रश्मी रविंद्र पाटील, सरपंच, आक्षी ग्रामपंचायत