वरसोली येथे रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्यावतीने दि.28 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत 5 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिराचे अलिबाग येथील मराठी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय वरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
यावेळी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला भाटकर, पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, आय.आय.टी.टी.एम, ग्वाल्हेरचे डॉ.रमेश देव्रथ, दि स्काय हॉटेलचे संचालक अभिजीत कवळे आणि ग्रामपंचायत वरसोलीचे सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी रघुजीराजे आंग्रे म्हणाले की, पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडागाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख असते. ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी, पक्षी यांची विपूल प्रमाणात उधळण केली आहे. त्याचबरोबर अर्वाचीन आणि मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. येणार्या पर्यटकांना अशी विविध वैशिष्ट्य उलगडून दाखविल्यास त्यांची येथील समाज जीवनाशी सांस्कृतिक नाळ जुळेल. पर्यटकांच्या रुपात लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे, तिचे स्वागत करून घरात घेणे वा दार लावून नाकारणे हे आपल्यावरच अवलंबून आहे. या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे, असे आवाहन करून त्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी पर्यटन कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे म्हणाले की, स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आलेल्या संधीचा योग्य उपयोग करावा. या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही देण्यात येणार आहे, असेही पर्यटन उपसंचालकहेडे यांनी सांगितले.







