। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील गणपतीपुळे हे फक्त धार्मिकच नव्हे, तर पर्यटनासाठीही नामख्यात क्षेत्र आहे. टाळेबंदीचे शैथिलीकरण आणि दिवाळीच्या सलग सुट्ट्या यामुळे गणपतीनपुळे परिसराकडे सुरू झालेला पर्यटकांचा ओघ अजुनही कायम असल्याचे चित्र आहे.
पर्यटकांकडून सप्ताह सुट्टीसाठी गणपतीपुळेला पहिली पसंती मिळत आहे. गेले दोन दिवस किनार्यावर प्रचंड गर्दी आहे. यामध्ये सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आहेत.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरण्यासाठी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा समुद्रकिनार्यांकडे होता. त्यामुळे दापोली, हर्णे, कर्देसह गणपतीपुळे किनारी पर्यटकांची गर्दी होती. तो ओघ गेल्या आठवड्यात कमी-अधिक प्रमाणात होता. पण आठवड्याच्या अखेरीस शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळे गाठले होते. गेल्या दोन दिवसात अनुक्रमे दहा हजार आणि आठ हजार पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले आहे.
सध्या तीस ते चाळीस टक्के पर्यटक निवासाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे हॉटेल, छोटे फेरीवाले यांना समाधानकारक ग्राहक आहे. सध्या येत असलेल्यांमध्ये कोल्हापूर, सांगलीतील पर्यटकांची संख्या अधिक आहे.







