पर्यटकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे पाणी

सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक रायगडात दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |

गेली तीन दिवस सलग सुट्ट्या, त्यातच नाताळ आणि थर्टी फर्स्टची फोडणी यामुळे अखंड महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. आज तिसरा दिवस सुट्टीचा असून, अनेक पर्यटकांचे थवे या निसर्गाचा मुक्तपणे आस्वाद घेण्यासाठी रायगडात विविध ठिकाणी दाखल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पुणे-दिघी मार्गावरील माणगाव हे ठिकाण महत्वाचे असून, या मार्गावर गेली तीन दिवस सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे शहर म्हणून माणगावकडे पाहिले जाते. या शहरातून तळकोकणात जाणारा महामार्ग आहे. मुंबईकडून कोकणात व तळ कोकणात जाणाऱ्या प्रवासी, पर्यटकांना मुंबई-गोवा महामार्ग जवळचा व सोयीस्कररित्या सोपा वाटतो. दुसरा मार्ग पुण्याकडून आहे. मात्र, तो लांब पडत असल्यामुळे अनेक प्रवासी, पर्यटक त्या मार्गे प्रवास सहसा करीत नाहीत. माणगाव बाजारपेठेतून हा मार्ग जात असल्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक वाढली आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असली तरी रस्ते मात्र गेली अनेक वर्षे जैसे थेच आहेत. त्यातच रस्तेच्या कडेला असणारी टपऱ्या, छोटे उद्योजक आणि महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, पर्यटक ही आपली वाहने रस्त्यालगत उभी करून बाजारात लहान-मोठी खरेदी करीत असतात. त्यामुळे मुंबई-गोवा तसेच दिघी-पुणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो.

शनिवार, रविवार व नाताळ तसेच दत्त जयंती अशा लागून सुट्ट्या त्यातच चार दिवसांवर थर्टीफर्स्ट आल्यामुळे पर्यटकांनी आपली कूच रायगडसह संपूर्ण कोकणाकडे मोठ्या प्रमाणात केली आहे. मुंबई, ठाणे, वसई, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून पर्यटक, प्रवासी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर, अजूनही प्रवासी प्रवासातच अडकले आहेत. या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, तासन्‌‍तास प्रवासात रस्त्यावरच पर्यटक, प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही चांगलीच दमछाक होऊन तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हे पर्यटक परतीच्या प्रवासाला लागल्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. पर्यटक या रस्त्याने प्रवास करण्यास उदासीन असून, तीव्र संताप व्यक्त करीत आहे. याचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने रुंद रस्ते, पर्यायी मार्ग व सुविधा उभाराव्यात, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version