वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील प्रवास होणार सुकर

भालगुल व जांभुळपाडा पुलांचे काम पूर्णत्वाकडे
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
मागील अनेक वर्षे पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पुलावरुन पाणी जाऊन सातत्याने धोक्याची स्थिती निर्माण होत होती. शिवाय, वाहतुकीसदेखील अडथळा निर्माण होई. वाकण- पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. या मार्गावर पाली अंबा नदी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. मात्र, हा अडसर दूर झाल्याने या पुलाच्या कामाला वेग आला आहे. तर, भालगुल व जांभुळपाडा येथील अंबा नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्णत्वाकडे आहे. पावसाळ्यात पाली व जांभुळपाडा पुलांवरून पाणी जाते. मात्र, येथे आता नवीन उंच, रुंद व अधिक क्षमतेचे पूल झाल्याने पावसाळ्यात पाणी जाणार नाही. यामुळे वाहतूक सुरळीत राहून प्रवासी, चाकरमानी व वाहन चालकांची कित्येक दशकांची गैरसोय थांबणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी जांभुळपाडा अंबा नदीवरील एक पूल बनून तयार झाला असून, त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. येथील दुसर्‍या पुलाचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच भालगुल येथील दोन्ही पूल मेअखेरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, पाली अंबा नदीवरील पुलाचे काम थांबले होते. येथील शेतकर्‍यांचे जमीन मोबदला व इतर मागण्यांसाठी एमएसआरडीसीसोबत वाद होता. परिणामी, पुलाचे काम रखडले होते. मात्र, याप्रकरणी पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काइंगडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी एमएसआरडीसी प्रशासन व शेतकरी यांच्यात समेट घडवून आणला. त्यामुळे या शेतकर्‍यांनीदेखील जागा देऊ केली. या सर्व प्रक्रियेत पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांच्यासह एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे, पालकमंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव श्री. वीरकर आणि शेतकरी यांचे सहकार्य लाभले.

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत
पाली अंबा नदीवरील एक पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल. त्यानंतर जुना पूल तोडण्यास घेतला जाईल. दुसरा नवा पूल नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. 15 जूनपर्यंत जांभुळपाडा अंबा नदीवरील दुसर्‍या नवीन पुलाचे कामदेखील पूर्ण होईल. भालगुल येथील दोन्ही पूल झाले आहेत. फक्त एका बाजूचे प्रवेशाचे काम बाकी आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी सहकार्य केल्यास तेही काम पूर्ण होईल. परिणामी, या मार्गावरून पावसाळ्यात वाहतूक सुरळीत होईल, असे एमएसआरडीसी उपअभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले.

महत्त्वाचा मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग पुणे-मुंबईवरुन खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय मानला जातो. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळुरु महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडतो. त्याचबरोबर येथून विळेमार्गे पुणे आणि माणगावला ही जाता येते. त्यामुळे मुंबई-पुणे तसेच कोकणासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. परिणामी, हे तिन्ही पूल पूर्ण झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होईल.

असे आहेत नवीन पूल
पाली, जांभुळपाडा व भालगुल या ठिकाणी तब्बल 25 कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. पाली अंबा नदीवरील नवीन पुलांची रुंदी 16 मीटर आहे. तर, लांबी 110 मीटर तसेच जांभुळपाडा पुलाची रुंदी 16 मीटर, लांबी 70 मीटर इतकी आहे. भालगुल पुलाची रुंदीदेखील 16 मीटर, तर लांबी 55 मीटर आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे होणार आहेत. त्यांची भार पेलण्याची क्षमता 75 टन आहे.
कोट

जूनपर्यंत वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे 100 टक्के काम पूर्ण होईल. फक्त पाली अंबा नदीवरील एका पुलाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल.

सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
Exit mobile version