| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वाकण-पाली खोपोली राज्य महामार्गावर जांभूळपाडा, भालगुल व पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे.
पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे कामे पूर्ण करण्याचे एमएसआरडीसी चे नियोजन होते. मात्र हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अजूनही येथील जुन्या, अरुंद व कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मुसळधार पाऊस आल्यास या पुलावरून पाणी जाते व दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. तसेच जांभुळपाडा येथील अंबा नदीवरील पुलांच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या या नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र येथील जुना पूल पाडून त्या जागी नव्या पुलाचे होणारे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. याबरोबरच भालगुल येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नवीन पुलाला लागून असलेली जागा शेतकर्यांकडून देण्यात आलेली नाही. या जागेसंदर्भात वाद सुरू असल्याने. परिणामी नवीन पूल बांधूनही तेथून वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. अशी ही पुलांची अपूर्ण असलेली कामे वाहनचालक व प्रवाश्यांना त्रासदायक व धोकादायक ठरत आहेत.
महत्वाचा मार्ग
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग पुणे मुंबई वरून खोपोलीमार्गे कोकणाकडे जाण्यासाठी वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे तिन्ही पूल पूर्ण झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होईल.
असे आहेत नवीन पूल
पाली, जांभूळपाडा व भालगुल या ठिकाणी तब्बल 25 कोटींच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. पाली अंबा नदीवरील नवीन पुलांची रुंदी 16 मीटर आहे. तर लांबी 110 मीटर तसेच जांभूळपाडा पूलांची रुंदी 16 मीटर, लांबी 70 मीटर इतकी आहे. भालगूल पूलांची रुंदी देखील 16 मीटर तर लांबी 55 मीटर आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे होणार आहेत. त्यांची भार पेलण्याची क्षमता 75 टन आहे.
महिना अखेरपर्यंत वाकण पाली खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण होईल. फक्त पाली अंबा नदीवरील एका पुलाचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. नागरिकांना प्रवासासाठी जांभूळपाडा पुलाची एक बाजू चालू करण्यात आली आहे. पाली खोपोली वाकण महामार्गावरील जुन्या पुलांचे स्ट्रॅक्टचरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यामुळे जुने पूल धोकादायक स्थितीत नसून प्रवासाकरिता योग्य आहेत.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
पावसाळ्यात पाली अंबा नदी पुलावरून पाणी गेल्याने पाणी उतरेपर्यंत कित्येक तास किंवा 1-2 दिवस पलीकडे अडकून राहावे लागते. चाकरमानी रुग्ण, महिला, वृद्ध यांचे खूप हाल होतात. त्यामुळे येथील पुलाच्या किमान एका मार्गिकेचे काम तरी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते.
सुशील शिंदे, प्रवासी इंजिनियर