। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सर्वाधिक पाणी टंचाईग्रस्त गावे वाड्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या चार आदिवासी वाड्या पाणी समृध्द झाल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी टँकर सुरू करावे लागणार्या या वाड्यांमध्ये जलजीवन मिशनचे पाणी पोहचले आहे. दरम्यान, वाडीमध्ये नळाला पाणी पोहचल्याने ताडवाडी, मोरेवाडी, बांगरवाडी आणि धाबेवाडीसाठी लागणारी पाण्याचे टँकर बंद झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये गेली दहा वर्षे भीषण पाणीटंचाई निर्माण होत होती. ताडवाडी मधील आदिवासी ग्रामस्थ एप्रिल आणि मे महिन्यात विहिरीवर रात्रीची वस्ती करीत होते. तर, मोरेवाडी मधील आदिवासी लोक बांगरवाडी येथील मातीच्या बंधार्यावर डवरे खोदून पाणी भरण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करून ये-जा करायचे. त्यामुळे या दोन्ही वाड्यांमध्ये राहणारे आदिवासी लोक उन्हाळ्यात सर्वात जास्त वेळ पिण्याचे पाणी शोधण्यासाठी घराबाहेर असायचे.
येथील नळपाणी योजना मंजूर होऊन आठ वर्षे झाले होती. मात्र, दोन वेळा पाण्याचा उद्भव बदलण्याची वेळ पाणी पुरवठा विभागावर आल्याने पाणी योजनेचे काम रखडले होते. शेवटी डोंगर पाडा येथे पाझर तलावाच्या पाण्याचा उद्भव निश्चित करण्यात आल्यानंतर 97 लाखाची नळपाणी योजनेचे काम सुरू झाले आणि यावर्षी उन्हाळयात तेथे नळाला पाणी पोहचले आहे. कशेळे खांडस रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात आल्यानंतर पाथरज ग्रामपंचायत मधील या दोन्ही वाड्या यावर्षी पासून टँकर मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे रात्री विहिरीवर जागरण करण्याची वेळ ताडवाडी आणि मोरेवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांवर येण्याचे बंद झाले आहे.