भाड्याची रिक्षा करून पाणी आणण्याची वेळ
| उरण । वार्ताहर ।
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्या चांदायली आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी दररोज मोठा संघर्ष करावा लागत आहे. आंघोळ, कपडे धुण्यासाठी पाणी मिळणे सोडाच पण प्यायला देखील पाणी मिळेल की नाही अशी भयंकर परिस्थिती येथे ओढावली आहे. मात्र याबाबत आवाज उठवूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आदिवासींना दररोज कोरड्या ठाक असलेल्या विहिरीत जीवघेणी कसरत करत उतरून अक्षरशा पाणी खरबडून भरावे लागत असून, टिपलीच्या पाण्याशी संघर्ष करावा लागत आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील केळाचा माळ व चांदायली आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. चांदायली आदिवासी वाडीवर पाणी प्रश्न मोठा बिकट झाला असल्याचे दिसून येत आहे. पाण्याचे एकमेव स्तोत्र असणार्या विहिरीतील कपारीत असलेल्या पाण्यासाठी या आदिवासींना दररोज विहिरीचा तळ गाठावा लागत आहे. तरच थोड्याफार प्रमाणात घोटभर पाणी त्यांना उपलब्ध होते. विहिरींनी तळ गाठल्यामुळे या वाडीवर वास्तव्यास असलेल्या पन्नास-साठ लोकांना ते पाणी पुरत नसल्याने, या आदिवासी बांधवांना भाड्याची रिक्षा करून चिरनेर गावातून पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र सर्वच आदिवासींना हा खर्च परवडत नसल्याने अनेकांनी स्थलांतर करून वीट भट्टीवर आश्रय घेतला आहे. ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मागणी करून देखील या आदिवासी बांधवांना पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त केला आहे.
1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्म्य पत्करलेल्या नाग्या महादू कातकरी यांचे वंशज याच आदिवासी वाडीत राहत होते. मात्र सत्याग्रहाची पार्श्वभूमी असताना या आदिवासी बांधवांना वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे.
भरत कातकरी, आदिवासी नेते