रस्त्यांमुळे स्थानिक व पर्यटकांत संताप
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन विभागातील रस्ते कित्येक वर्षे दुर्लक्षित आहेत. तर, काही रस्ते अतिवृष्टीमध्ये टिकाव धरत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिल्यास रस्ते सुस्थितीत होतील, हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
श्रीवर्धन पर्यटनात वाढ होत असल्याने येथे नेहमीच हजारो वाहनांची ये-जा सुरू आहे. पुणे, मुंबई शहराला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याचे आता दिघी-पुणे महामार्गात बदल झाल्याने लांबचा प्रवास कमी वेळात सुखकर ठरला आहे. मात्र, येथील दिवेआगर पर्यटन स्थळांच्या रस्त्यांवर पोहोचल्यावर खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कोकणातिल पर्यटन खास करून श्रीवर्धनच्या स्थळांना राज्यभरातून अनेक भाविक व पर्यटक हरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन व जंजिरा किल्ल्यावर नेहमीच ये-जा करतात. परंतु, तालुक्यात आल्यावर रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे आपण श्रीवर्धनला आलो आहोत, याची जाणीवही होते. त्यामुळे पर्यटक व भाविकांना या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
बोर्लीपंचतन-श्रीवर्धन सरळ मार्गावर चिखलप ते बोर्लीपर्यंत अंदाजे 11 किमी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण. नागलोली-धनगरमलई 5 किमी अंतराचा रस्ता नूतनीकरण व वडवली वरून दिवेआगरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार आहे. डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल.
तुषार लुंगे,
उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन.