वीज पडून दोन कामगार जखमी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

राजापूर तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. या अवकाळी पावसामध्ये राजापूर तालुक्यातील जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना शुकवारी दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी तात्काळ रत्नागिरी येथे हलविण्यात आले असून प्रकाश अंबाजी मोरे (52) आणि विलास शिवाजी धावडे (43) अशी जखमींची नावे आहेत.

राजापूर तालुक्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. काही भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या सरी कोसळत असताना, जोरदार विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहत आहेत. शुकवारी दुपारनंतर जवळथेर परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकाव झाला. दरम्यान प्रकाश मोरे आणि विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळली. यात ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, तालुक्यातील होळी सडेवाडी येथेही वीज पडल्याने परिसरातील घरांमधील वीजेची उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version