| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लागून असलेल्या उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण व चिकनची दुकाने तेजीत सुरू आहेत. या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी उलवे शहर नियोजन समितीचे संतोष काटे यांनी केली आहे. तसेच, या मागणीच्या अंमलबजावणीसाठी नवरात्रौत्सवमधील दि.22 ते 30 सप्टेंबर असे नऊ दिवस ते अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत.
नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून 10 किलोमीटर परीघात प्राण्यांची कत्तल करणे, त्याची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर प्राणघातक पदार्थ टाकणे, याला सक्त मनाई करण्यात आली आहे. कारण अनेक पशूपक्षी अन्नाच्या शोधात हे फेकलेले मांस व टाकावू पदार्थ खाण्यासाठी याठिकाणी येत असतात. त्याचवेळी या भागातून विमान उडत असताना त्यांना पक्ष्यांची धडक लागून अपघात होतो. तसेच, कुजलेले अवशेषांमुळे जीवघेणी रोगराई पसरते. त्यामुळे शासनाच्या एरोड्रेम पर्यावरण व्यवस्थापन समितीने विविध निर्बंध लादत 10 किलोमीटर परिसरात प्राण्यांची कत्तल करु नये, अवशेष टाकू नये, कचरा करु नये, असे निर्णय घेतला आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली उलवे शहरामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे.







