डोंगराला तडे जाऊन दरडीची भीती
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथील दत्त मंदिर टेकडीवर सुरू केलेल्या खोदकाम व बांधकामास सुरई महिला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी मोठ्या संख्येन सुरई ग्रामस्थ, महिलांनी तूर्तास काम बंद करावे, अशी मागणी रेवदंडा पोलिसांकडे केली.
सुरई येथील दत्त मंदिर टेकडीवर ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, शासकीय योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथील ठेकेदारांनी या कामाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामस्थांना दिली नाही, त्यामुळे संप्तत महिलांनी टेकडीवर जाऊन काम थांबविले असून, पोलिसांना तूर्तास काम थांबवावे, अशी मागणी केली. दत्त टेकडीवर सुरू करण्यात आलेल्या शासकीय कामाबाबत सुरई महिला व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड व सुरई दत्त टेकडी ट्रस्ट यांना निवेदन पत्र दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, सुरई गावास लागून असलेल्या दत्त मंदिर परिसरातील डोंगरावर काही अनधिकृत खोदकाम व बांधकाम सुरू आहे. यापूर्वीसुद्धा या कामाबाबत लेखी निवेदन अर्ज केले होते, त्यानुसार काम बंद करण्यात आले होते. मात्र, चार-पाच दिवसांपासून पुनश्च हे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचे खोदकाम व बांधकाम करण्याकरिता सुरई गावातील राजिप शाळेच्या जवळून अवजड वाहनांची जा-ये सुरू आहे. या वाहनांतून बांधकाम साहित्य ने-आण केले जाते. या शाळा परिसरात लहान मुलांचा वावर असल्याने अपघातास आमंत्रण ठरते, तसेच डोंगर परिसरात मशीनद्वारे खोदकाम सुरू असून, परिसरातील डोंगराला हादरे बसत आहेत. मशीनद्वारे दिवसरात्र सुरू असलेल्या खोदकामाने डोंगराला तडे जाण्याची दाट शक्यता असून, डोंगर माथ्यावरून खाली वसलेल्या सुरई गावाच्या घरावर या डोंगरातील दरडी कोसळण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशी काही आपत्ती निर्माण झाली तर संबंधित जबाबदार राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच दत्त मंदिर परिसरातील डोंगरातील अनधिकृत खोदकाम व बांधकामास सुरई ग्रामस्थांचा विरोध असून, तेथील अनधिकृत खोदकाम व बांधकामे बंद करावीत, अशी मागणी या निवेदनात केली आहे. तसेच सुरई गावचे राजिप शाळेजवळून होत असलेली अवजड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
दत्त मंदिर टेकडीवर सुरई ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, शासकीय योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथील ठेकेदारांनी या कामाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सुरई ग्रामस्थांना दिली नाही, त्यामुळे संतप्त महिलांनी टेकडीवर जाऊन काम थांबविले असून, रेवदंडा पोलिसांना त्वरित काम थांबवावे, अशी मागणी केली आहे.